सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवर नेमळे फौजदारवाडी येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोमांससदृश्य मांसाची अतिवेगाने वाहतूक करणारी एक अर्टिगा कार नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकून रस्त्याच्या पलीकडे उलटली. अपघात झाल्यावर कारमधील सुमारे ४०० ते ५०० किलो गोमांस रस्त्यावर विखुरले. अपघातानंतर चालक सद्दाम दलावसाब यलवट्टी (वय ३१, रा. गोवा, मूळ रा. कर्नाटक) याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पाठलाग करून पकडले आणि सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. प्राथमिक चौकशीत ही कार कर्नाटकातील अभय नामक व्यक्तीची असल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपीने हे मांस निपाणी येथूनआणल्याचे सांगितले असले, तरी ते बर्फात ठेवलेले नव्हते. त्यामुळे हे मांस सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच गोव्याच्या दिशेने नेले जात असल्याचा अंदाज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
