कुडाळ वार्ताहर: कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडे येथे एक वयस्कर व्यक्ती गेली ३५ वर्ष आपल्या अंगात निरंकाराचे वारेसूत्र येत असल्याचे भासवून अनेक भाविकांच्या समस्या सोडवीत असल्याचे आणि सामान्य जनतेच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असल्याची माहिती क्राईम इन्वेस्टीगेशन एक्सप्रेसचे जनसंपर्क अधिकारी आणि ह्यूमन राईटचे पदाधिकारी यांना मिळाली.त्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांना सोबत घेऊन काही दिवसापूर्वी त्यांच्या घरी गेले. सदर वयस्कर व्यक्तीच्या अंगात निरंकार वारेसूत्र आल्यानंतर दिव्य शक्तीने काय काय ओळखता येते याची शहानिशा केली. यावेळी विजय चौकेकर यांनी आपल्या हयात नसलेल्या मुलाला लग्न होऊन सात वर्षे झाली तरी मूलबाळ होत नाही ते कशामुळे हे विचारले असता त्याने मुलाला अतृप्त आत्म्याने झपाटलेला आहे. तसेच सुनेवर करणी केलेली आहे. मुलावरील अतृप्त आत्मा बाजूला केल्या शिवाय आणि सुनेवरील करणी काढल्याशिवाय मूल होणार नाही असे सांगून त्यावर उपायही सांगितले. तसेच चौकेकर यांना मुलगी नसतानाही माझ्या मुलीला जावयाने घरी आणून सोडले . तीच्या पोटात सतत चावरी करते ती कशामुळे असे विचारले असता मुलीच्या पोटात गाठ आहे मी विभूती खायला देतो. ती तिला तीन दिवस द्या. पोटातील चावरी कमी होईल असे उपायही सांगितले. मुलीला संबंध बाधा असल्याने ती काढल्यावर नवरा तीला नांदायला घेऊन जाईल असे सांगून त्यावर उपायही सांगितले. क्राईम इन्वेस्टीगेशन एक्सप्रेसच्या अधिकाऱ्याने त्यांना आपल्या व्यवसायात यश येत नाही ते कशामुळे असे विचारले त्यावरही त्याने कुटुंबाने करणी केली आहे. त्यांचे लग्न झालेले असतानाही माझे लग्न का जुळंत नाही असे विचारले. त्यावर तुमच्यावर भूतबाधा असल्याने येणारी स्थळे परत जातात.ती भूतबाधा उतरल्या शिवाय लग्न होणार नाही.असे सांगितले. त्याचे लग्न झालेले आहे हे हि त्या वारेसुत्राला ओळखता आलेले नाही.अंगात आलेल्या वारेसूत्राला चौकेकर यांना मुलगा नाही, सून नाही, मुलगीही नाही. है दिव्य शक्तीने ओळखता आलेले नाही .
सदर व्यक्तीला आपण कोण आहोत याची खरी ओळख क्राईम इन्वेस्टीगेशन एक्सप्रेसचे जनसंपर्क अधिकारी व विजय चौकेकर यांनी करून दिली.जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये भूत लागले आहे म्हणून सांगणे,करणी केली आहे म्हणून सांगणे, त्यावर उपायही सांगणे हा गुन्हा ठरतो हे समजावून दिले.तसेच स्वतःकडे वैद्यकीय सुविधा नसताना एखाद्या आजाराचे निदान करणे, त्यावर औषध म्हणून विभूती खायला देणे, हे कृत्य ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडीज ॲक्ट 1954 खाली गुन्हा ठरतो. या कायद्याखाली सहा महिने ते सात वर्षे शिक्षा आहे पाच हजार ते पन्नास हजार दंड आहे हे समजून सांगितले . आपण सांगितल्या समस्या आणि त्यावरचे उपाय जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा ठरत असल्याचे लक्षात येताच त्या भोंदूबाबांनी त्यांच्यासमोर शरणागती पत्करली. माझ्याकडे कोणतीही अलौकिक शक्ती नाही. मी माझ्यात अंगात माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे व कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी संचार झाल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत होतो .तरी माझ्यावर जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करू नये. मी आजपासून माझ्या अंगात वारे सूत्र काढणार नाही. तसेच माझ्या परिसरात यापुढे कोणीही माझ्याकडे समस्या विचारायला येऊ नये असा बोर्ड लावेन. माझ्यात कोणतीही अलौकिक शक्ती येत नाही.माझ्या वयाचा विचार करून एक वेळ मला संधी द्यावी. अशी विनंती केली.त्यांच्या वयाचा आणि गरिबीमुळे त्यांनी हें कृत्य करीत असल्याचे लक्षात घेता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर व क्राईम इन्वेस्टीगेशन एक्सप्रेस जनसंपर्क अधिकारी आणि ह्यूमन राईटचे पदाधिकारी यांनी त्यांच्याकडून लेखी माफीनामा लिहून घेतला. पुन्हा असे कृत्य न करण्याची आणि परिसरात दोन दिवसात तसा बोर्ड लावण्यास सांगितले .त्यांनीही यापुढे मी असे काही करणार नाही हे प्रतिमेवर लिहून दिले व तसा बोर्डही परिसरात लावला. आपल्या परिसरात असे भोंदू बाबा आणि जादूटोणा करणारे कोणी असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यातील दक्षता अधिकारी यांना द्यावी असे आवाहन जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले आहे .
