जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननाशी संबंधित प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथे ही कारवाई करण्यात आली.
जालना | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील त्याच्या निवासस्थानी सापळा रचून एसीबीने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळू उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री व वाहनांच्या कामकाजात अडथळे येऊ नयेत यासाठी तक्रारदाराकडे मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून बीड एसीबीच्या पथकाने सापळा रचला. कारवाईदरम्यान विजय चव्हाण याने ६ लाख ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात आवश्यक पुरावे जप्त करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एका दिवसात एसीबीच्या दोन मोठ्या कारवाया
दरम्यान, गुरुवारीच जालना एसीबीने बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे कारवाई करून एका पोलीस अंमलदाराला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती. त्यामुळे एका दिवसात महसूल आणि पोलीस विभागातील दोन अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
जिल्ह्यात चर्चेला उधाण
विजय चव्हाण हा विविध प्रशासकीय उपक्रमांमुळे आणि नागरिकांशी थेट संपर्क ठेवणारा अधिकारी म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे त्याच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर सर्वसामान्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी जालना महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. त्यानंतर आता तहसीलदारावरील कारवाईमुळे जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यानस आता या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू असून लाचखोरीच्या या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
