अंबरनाथ | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अंबरनाथकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्रोत असलेल्या चिखलोली धरणाजवळील जांभिवली पाणलोट क्षेत्रात विनापरवाना ‘बायो-मेडिकल कचरा ज्वलन प्रकल्प’ उभारण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले की, या संवेदनशील क्षेत्रातील प्रकल्पाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही संबंधित कंपनीचे काम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.अंबरनाथकरांच्या आरोग्य आणि भविष्यातील पाणी सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करत श्री. अनिल लक्ष्मण भोईर यांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
नागरिकांची भूमिका स्पष्ट : “विकासाला विरोध नाही, पण अंबरनाथचे पाणी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा विकास आम्हाला मान्य नाही,” असे भोईर यांनी म्हटले आहे.प्रशासनाने या अनधिकृत कामाची तातडीने दखल घेऊन प्रकल्प बंद करावा आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पाण्यासाठी एकत्र! अंबरनाथ शहराचे लक्ष प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.
