सावंतवाडी प्रतिनिधी: रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची गुणवत्ता खराब होत आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवून जमिनीतील उपलब्ध अन्नघटक पिकांना मिळवून देण्याचे काम गोकृपा अमृतम करते. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी गोकृपा अमृतम घरच्या घरी बनवून वापरावे त्यामुळे त्यांच्या उत्पादनात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी श्री. अनिकेत कदम यांनी केले. होडावडा येथील श्री मंगेश माणगावकर यांच्या बागेमध्ये कृषी विभागातर्फे गोकृपा अमृतम हे जैविक द्रावण तयार करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. हे द्रावण करण्याबरोबरच बीज उगवण क्षमता आणि बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक श्री पंकज पाटील यांनी गोकृपा अमृतम द्रावणामध्ये प्रक्रिया केलेले बियाणे आणि प्रक्रिया न केलेल्या बियाणांचे प्रात्यक्षिक दाखवले. मंडल कृषी अधिकारी श्री शंकर नाईक यांनी बागेतील झाडांना जैविक अच्छादन कसे करावे? याची माहिती दिली तसेच यावेळी बागेतील नारळाला जैविक अच्छादन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
यावेळी मंगेश माणगावकर यांनी त्यांच्या बागेतील रक्षक सापळे, कृत्रिम अंडी उबवणूक पेटी, कल्की द्रावण, बेडूक संवर्धन, गांडूळ खत इत्यादी उपक्रमांची माहिती दिली. माणगावकर यांच्या बागेतील गोकृपा अमृतम् तयार झाल्यानंतर गावातील शेतकरी आणि बागायतदारांसाठी त्याचे वितरण करण्यात येणार आहे. तरी प्रत्येकाने हे द्रावण नेऊन आपापल्या घराकडे हे जैविक द्रावण बनवून आपापल्या शेतात तसेच बागेत वापरण्याचे आवाहन श्री कदम यांनी केले. यावेळी शेतकरी बांधवांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले सदर कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव आणि महिला वर्ग उपस्थित होते तसेच बहुसंख्य ग्रामस्थांनी सदर कार्यक्रमास भेट देऊन माहिती घेतली.
