सावंतवाडी (संतोष परब): महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस टी) महामंडळाच्या प्रवास सवलतींसाठी १ ऑगस्टपासून स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आधार कार्ड हे वय आणि अधिवासाचा पुरावा म्हणून उपलब्ध असतानाही नव्याने स्मार्ट कार्ड सक्तीचे केल्यामुळे नागरिकांना भर पावसात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.यापूर्वी एसटीच्या विविध सवलतींसाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जात होते. मात्र आता स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले असून, ते तयार करण्याची सुविधा केवळ नियुक्त कंत्राटदाराकडेच उपलब्ध आहे. सावंतवाडीतील संबंधित कंत्राटदाराकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा २० रुपये अधिक आकारले जात असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर संबंधिताने कार्यालय बंद केले.दरम्यान,अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरूनही त्यांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळालेले नाही. कार्ड घेण्यासाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून, कार्यालय सतत बंद असल्याने नागरिकांची मोठी परवड होत आहे.
दि. २१ जुलै दिवशी अनेक ज्येष्ठ नागरिक कार्यालयाबाहेर दोन ते अडीच तास प्रतीक्षा करत होते. मात्र कार्यालय न उघडल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. या विषयी नागरिकांनी एसटी डेपो व्यवस्थापकांची भेट घेतली. मात्र, संबंधित कंत्राटदाराविषयी डेपो प्रशासनाकडे कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी.येथील वॉचमनकडून फोन नंबर घेऊन संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “आता न्याय मागायचा कुणाकडे?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्मार्ट कार्ड वितरणातील गोंधळ तातडीने दूर करून सावंतवाडीत नियमित सेवा उपलब्ध करावी तसेच ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
