स्टोरी

वाहतूक पोलिसांना दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार नाही! सत्र न्यायालय

Spread the love

१८ जून वार्ता: वाहतुकीचे नियम न पाळता तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका तरुणाला मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. याचवेळी पोलिसांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर बोट ठेवत न्यायालयाने वाहतूक पोलिसांना सुनावलं आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही. तसेच दुचाकीचालकाने ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यानंतर दंडवसुलीसाठी त्याला पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करू शकत नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, कुलाबा परिसरातील एन.एस. रोडवरील सिग्नलवर सागर पाठक हा तरुण विनाहेल्मेट दुचाकी चालवत होता. वाहतूक पोलीस जवळ येत असल्याचे पाहून त्याने लगेच हेल्मेट घातले होते. यावेळी वाहतूक नियम मोडल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दंडवसुलीची कारवाई सुरू केली, तेव्हा सागरने कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणी कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून सागरविरुद्ध भादंवि कलम 332 आणि 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि 25 मे 2017 रोजी त्याला अटक केली होती. मागील सहा वर्षे या घटनेचा खटला सत्र न्यायालयात चालला. आरोपी सागरने कॉन्स्टेबलकडे ड्रायव्हिंग लायसन्स जमा केले होते. त्यानंतर त्याला मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला गेला. याचदरम्यान कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याचा आरोप होता. तथापि नियम मोडणाऱ्या दुचाकी चालकाने पोलिसांकडे ड्रायव्हिंग लायसन्स जमा केल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेणे हे बेकायदेशीर कृत्य आहे, असे मत नोंदवत सत्र न्यायाधीश निखिल मेहता यांनी आरोपी सागर पाठकची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली आहे, ते पाहता वाहतूक पोलिसावर शासकीय कर्तव्य बजावताना हल्ला झाल्याचे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.


Spread the love

Related posts

मोती तलावा मधील पाणी स्वच्छ करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज…!

news

अपघातग्रस्त विद्यार्थिनी हर्षदा निगवेकर हिला प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणचा मदतीचा हात!

news

सिध्दिविनायक रिअल इस्टेटतर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप!

news

Leave a Comment