बांदा: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त इन्सुली शाळा नं. ७, बिलेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकरी दिंडीने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. वारकरी वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका हातात घेऊन आणि “जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल” या नामघोषात दिंडी काढत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.या दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाला ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठेका धरला. विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ सर्वजण भक्तिरसात रंगून गेले. बाल वारकऱ्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण बिलेवाडी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.या कार्यक्रमासाठी शालेय मुख्याध्यापक श्री. दिलीप चव्हाण, सहशिक्षक श्री. महेश सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गजेंद्र कोठावळे, अंगणवाडी सेविका सौ. मनाली नाईक, अंगणवाडी मदतनीस सौ. सिद्धी कोठावळे यांच्यासह ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. नरेंद्र सावंत, श्री. निळकंठ कोठावळे, आणि श्री. सीताराम कोठावळे, श्री. सुशांत सावंत, श्री. विशाल कोठावळे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. राजश्री कोठावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी उपस्थित पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे कौतुक करत अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त केले.आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या बाल वारकरी दिंडीमुळे संपूर्ण बिलेवाडी गाव विठ्ठलनामाच्या गजरात दंग होऊन भक्तिमय आनंदाचा अनुभव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
