माणगाव (श्री दीपक पटेकर): गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे, याच उदात्त हेतूने ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन’ सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने माणगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक गरीब व गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करणे आर्थिक अडचणींमुळे शक्य होत नाही. हीच अडचण ओळखून संघटनेच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माणगाव सरपंच मनिषा भोसले, प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र भिसे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, महिला जिल्हाध्यक्षा मानसी परब, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, सचिव विनोद जाधव, खजिनदार संदीप सुकी, कवी दीपक पटेकर, पत्रकार शैलेश मयेकर, अमित पालव, नयनेश गावडे, सदस्य नामदेव जानकर, रेवती वालावलकर, शंकर घाडी आदी उपस्थित होते.
वह्या वाटप कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. संस्थेचे सदस्य एकनाथ कुर्लेकर सरांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या एकंदर कामाची माहिती दिली. संघटना जिल्ह्यात गेले आठ वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत विविध उपक्रम राबवते यात मागील दोन वर्षे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला, महिला दिनाचे औचित्य साधुन अनेक महिलांचा सन्मान केला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक केलेल्या संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या संघटनेच्या माध्यमातून कॅम्प लावून ४५ गरीब व गरजू लोकांना बांधकाम कामगार योजनेचे कार्ड काढून शिष्यवृत्ती भांडी संच मिळवून त्या योजनेचा फायदा मिळवून दिला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले जिल्हाध्यक्ष धुरी व उपाध्यक्ष कांडरकर यांना गरिबांच्या गरजेची जाणीव असल्यानेच त्यांच्या हातून हे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासारखे पवित्र काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र भिसे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला आणि अशा उपक्रमांसाठी आपल्याला उपस्थित राहता आले हे आपले भाग्य असल्याचे नमूद केले. मानसी परब यांनी थोडक्यात संस्थेचे कामकाज कसे चालते यावर भाष्य केले व गोरगरीबांचे प्रश्न प्रशासन दरबारी मा़डून जनतेला न्याय मिळवून देणे अन्यायाविरुद्ध लढून सामान्याला न्याय देणे हा संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच मनिषा भोसले यांनी पत्रकार म्हणून काहीजण फक्त मिरवतात परंतु मिलिंद व आनंद सारखे सर्वसामान्य कुटुंबात राहणारे पत्रकार समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतात. ते इतर कसल्याही कामासाठी आपल्याकडे येत नाहीत परंतु सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करतात हे वाखाणण्याजोगे आहे असे कौतुकपर उद्गार काढून मिलिंद धुरी आणि सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
वह्या वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माणगाव सरपंच मनिषा भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र भिसे, कवी दीपक पटेकर, व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार शैलेश मयेकर आदींचे संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी दांपत्याचा देखील माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
“शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी आमच्या असोसिएशनने हा छोटासा यशस्वी प्रयत्न केला आहे. आगामी काळातही विद्यार्थ्यांसाठी असे विविध उपक्रम राबवले जातील.” असे सांगून सचिव विनोद जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवा सावंत यांनी केले.
