सावंतवाडी: शहरात राबविण्यात येत असलेल्या सुमारे ५६ कोटी रुपयांच्या २४तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत झालेल्या कामांची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी (क्वालिटी ऑडिट) करून त्याचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम देवराम केनवडेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी शहराच्या वाढत्या पाणीआवश्यकता लक्षात घेऊन विविध पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यात आले; मात्र अनेक कामांचा अपेक्षित लाभ अद्याप नागरिकांना मिळालेला नाही. लाखे वसाहत, हेल्थ पार्क, रघुनाथ मार्केट आदी ठिकाणी उभारण्यात आलेले जलकुंभ (पाण्याच्या टाक्या ) आवश्यक जलवाहिन्यांच्या अभावी अद्याप वापरात आलेले नाहीत. पाळणेकोंड येथील जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असले, तरी तेथून शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक जलवाहिनी नसल्याने या केंद्राचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.तसेच नरेंद्र डोंगर येथील नैसर्गिक झरा योजना उन्हाळ्यात निष्प्रभ ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उभाबाजार परिसरातील जलवाहिनीवरील स्वयंचलित एअर व्हॉल्व्ह प्रत्यक्षात हाताने चालवावे लागत असल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.सध्या २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र या कामांवर सक्षम तांत्रिक देखरेख नसल्याचे दिसून येत असून काही भागांत वारंवार खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांनी आक्षेप घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या खर्चाच्या योजनेत गुणवत्ते विषयी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकाकडून संपूर्ण कामांची तपासणी करण्यात यावी, केनवडेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, ते ७५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असून सावंतवाडी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील विविध टप्प्यांचे साक्षीदार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी या योजनेतील कामांची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुनिश्चित होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणी शासनाने तातडीने लक्ष घालून स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
