१८ मे वार्ता: आफ्रिकेत इबोला विषाणूनं थैमान घातलं आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. आतापर्यंत इबोलाच्या संसर्गानं ९० जणांचा मृत्यू झालाआहे. तसेच ३०० हून अधिक जण आजारी पडले आहेत. भारतात अद्याप तरी इबोलाचा रुग्ण सापडलेला नाही. पण सरकार आणि डॉक्टर सतर्क झाले आहेत. आफ्रिकेतील दोन देशांमध्ये इबोला वेगानं पसरला आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि युगांडामध्ये इबोलाचा संसर्ग सर्वाधिक आहे. ही परिस्थिती पाहता WHO नं PHEIC म्हणजेच आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. सर्वसाधारण भाषेत सांगायचं झाल्यास जगातील सर्वोच्च दर्जाचा हेल्थ अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. एखादा आजार, विषाणू संसर्ग केवळ एका देशापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगासाठी धोकादायक बनतो, तेव्हा हा अलर्ट जारी केला जातो.
भारतात यापूर्वी नोव्हेंबर २०१४ मध्ये दिल्लीतील २६ वर्षांचा तरुण इबोला बाधित आढळून आला होता. तो लायबेरियातून परतला होता. त्यावेळी प्रशासनानं वेगवान हालचाली केल्या. त्याला अन्य लोकांपासून वेगळं ठेवण्यात आलं. त्याच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात आली आणि विषाणूचा फैलाव रोखण्यात आला.भारताला असलेला धोका कमी आहे. पण त्यामुळे बेजबाबदारपणा चालणार नाही, अशा शब्दांत दिल्ली एम्सच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी धोक्याचा इशारा दिला. ‘एखादा रुग्ण गर्दीच्या, वर्दळीच्या जागी, रुग्णालयात पोहोचला, तरीही समजू शकणार नाही. अशा स्थितीत संकटाला आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे विमानतळावर स्क्रीनिंग आणि डॉक्टरांची जागरुकता महत्त्वाची आहे,’ असं राय यांनी सांगितलं.
