संपादकीय ✍🏻: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळूचे अनियंत्रित आणि मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन सुरु आहे. हे निसर्गासाठी अत्यंत हानिकारक ठरत आहे. वाळूच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. नद्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळू काढल्यामुळे नदीपात्र खोल आणि रुंद होते. परिणामी नदीकाठची धूप वाढत आहे. त्यामुळे साहजिकच उष्णता हि वाढत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शेतजमिनी आणि जवळच्या वस्त्या पाण्यात वाहून जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एखाद्या नदीपात्रातील वाळू हे स्पंजसारखे काम करते, ज्यामुळे पाणी साठवून ठेवणे आणि ते पाणी जमिनीमध्ये जिरवण्याचे काम होते. मात्र मोठ्या प्रमाणात वाळू काढल्यामुळे भूजल पातळी खाली जात आहे व आसपासच्या भागात पाणीटंचाई आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. एकूणच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन हे मानव जीवनाला धोकादायक ठरत आहे.
असं असतांना कोकणात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन सुरु आहे. कुडाळ आणि मालवण तालुक्यातील नदीमधून जोरदार वाळू उत्खनन सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. रात्री आठ नंतर सावंतवाडी, कुडाळ, मालवण या भागात बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वरदहस्थामुळे आणि हप्तेखोरी मुळेच ही वाळू वाहतूक जोरदार सुरु आहे. विशेष म्हणजे कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असून कुडाळ येथील तहसीलदार कार्यालयातून याकडे का लक्ष दिले जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर पोलिसांच्या समोरून ही वाळू वाहतूक होत असतानाही पोलीस कर्मचारी यावर का कारवाई करत नाहीत? रात्रीच्या वेळी २०० पेक्षा जास्त डंपर वाळू वाहतूक करत असताना एकात दुसरा डंपर कुठेतरी अडवून मोठी कारवाई केल्याचे दाखवून प्रशासकिय अधिकारी नेमकं काय सिद्ध करत आहेत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारे डंपर ड्रायव्हर सुसाट डंपर चालवत आहेत. जे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. तरी याकडे संबंधित प्रशासकीय अधिकारी, पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. असे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रत्येक वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीकडून हप्ते वसूल करत असल्याचीही चर्चा सुरू आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बांधकाम विभागाची कामे जोरदार सुरू आहेत. उदाहरणार्थ काँक्रीटचे रस्ते, ब्रिज बांधणे, सरकारी इमारती बांधणे आणि इतर कामे सुरू आहेत. बांधकामची कामं करणारे जिल्ह्यातील ठेकेदार सध्या वाळू कुठून आणतात? जर जिल्ह्यात वाळू बंद आहे, तर ह्या ठेकेदारांना वाळू मिळते कशी? आणि प्रशासकीय कामे पूर्ण होतात कशी आणि प्रशासना प्रशासन यावा प्रशासकीय अधिकारी याबाबत कोणती सर्व्हिस्तर चौकशी न करता या कामांची बिले कशी पास करतात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रकरणाचा विचार करता जिल्ह्यातील काही प्रशासकिय अधिकारी स्वतःच्या स्वार्थासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. हे नाकारता येणार नाही. आणि याचे वाईट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत आहेत. चे हानिकारक परिणाम निसर्गावर होत आहेत. हे समजून घेणे काळाची गरज आहे. लवकरच यावर सुज्ञ नागरिकांनी, समाजसेवकांनी योग्य तो पर्याय काढून लढा दिला नाही, तर भविष्यात कोकणी माणसाला खूप वाईट परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. हे नाकारता येत नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतुकीला नेमका जबाबदार कोण? याकडे आता कोकणातील शुद्ध सुज्ञ नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
