सावंतवाडी: पागावाडी–बिलेवाडी मार्गे अनेक वर्षांपासून सुरू असलेली बस सेवा अचानक अधूनमधून रद्द होत असल्यामुळे स्थानिक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इन्सुली गावाच्या टोकाला असलेल्या पागावाडी व बिलेवाडी या दोन्ही वाड्यांमधून धावणारी ही बस सेवा बंद पडल्यास प्रवाशांना साधारण सहा ते सात किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो.
यामुळे कॉलेजमधील विद्यार्थी, दवाखान्यात जाणारे रुग्ण, भाजी व दूध घेऊन जाणारे शेतकरी तसेच विविध कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होऊन त्यांची कामे रखडतात.या गंभीर समस्येचा विचार करून बिलेवाडी–पागावाडी येथील ग्रामस्थांनी सावंतवाडी आगार प्रमुखांना निवेदन देऊन बस सेवा नियमित व सुरळीत सुरू ठेवण्याची ठाम मागणी केली. वारंवार बस रद्द होत असल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असून भविष्यातही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास बस स्थानकावर घेराव घालण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी आगार प्रमुखांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेत बस सेवा कायम सुरळीत सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कोठावळे, शंकर पाटील, विशाल कोठावळे, मंदार सावंत, सौरभ कोठावळे, सचिन सावंत व रुद्र सावंत आदी उपस्थित होते
