क्राईम

प्रामाणिक पत्रकारिता काळाची गरज…..

Spread the love

पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मृत्यू झाला. वारीशे यांचा अपघातात मृत्यू झाला. असं काहींचं म्हणणं आहे तर काहींचं म्हणणं आहे की त्यांची हत्या करण्यात आली. हा अपघात होता की हत्या होती हे सिद्ध होईल की नाही हे सध्या तरी सांगणं शक्य नाही. मात्र लाजास्पद आणि घृणास्पद वाटायला लागले ते म्हणजे पत्रकार शशिकांत वरीशे यांची हत्या झाल्यानंतर काही संघटना आणि काही पत्रकार आंदोलन करण्यासाठी पुढे आले.

शशिकांत वरीशे

शशिकांत वरीशे यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेकांना त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती? त्यांचं घर कसं होतं? त्यांचा मुलगा काय करतो? त्यांची आई काय करते? त्यांची बायको कधी वारली? अशे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्यावर चर्चा होऊ लागली. कधीही कोणत्या पत्रकाराची जिवंत असताना अशी कोण माहिती का घेत नाही? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. एखाद्या पत्रकार, एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा कोणी लहान मोठ्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्याची हत्या झाल्यानंतर समाजातील विशेष संघटना आणि काही पत्रकार त्याचा आढावा घेतात. अर्थात मृत्यू झाल्यानंतर त्याची गरिबी, त्याचा चांगुलपणा किंवा त्याचं सर्व काही समाजासमोर मांडलं जातं. पण जर एवढी आपुलकी आपल्या समाजातील लोकांना किंवा काही पत्रकारांना या पत्रकाराबद्दल होती तर कधी या पत्रकाराची गरीबी दूर करण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केले? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. सध्या काही पत्रकार शशिकांत वरीशे प्रकरणाला उचलून धरत आंदोलन करत आहेत. आणि निवेदने सादर करत आहेत. पण अक्षरशः आपल्या जिल्ह्यातील पत्रकारिता बघितली तर आपल्या जिल्ह्यातील काही पत्रकारच एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. हे कुणाला सांगायला नको.

जिल्ह्यात डिजिटल मीडियाची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस डिजिटल मीडियांमध्ये वाढ होत आहे. दिवसेंदिवस काही पत्रकारांमध्ये स्पर्धा वाढत चालली आहे. काही पत्रकारच एकमेकांच्या विरोधात उतरलेले आहेत. काही पत्रकार तर जाहिरातीसाठी, धंद्यासाठी वाटेल त्या पद्धतीने पत्रकारिता करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे काही पत्रकारच एकमेकांंबाबत एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. हे काही नाकारता येणार नाही. स्वतःचे न्यूज नेटवर्क कसं जास्त चालेल? स्वतःचं नाव कसं मोठं होईल? यासाठी जास्तच जास्त प्रयत्न करणे आणि आपल्या पुढे कोणी जाऊ नये यासाठी काहीजण प्रयत्नशील असतांना दिसत आहेत. आपल्या स्पर्धेत असलेल्या पत्रकाराला कसं बाहेर करावं? याकडे काही पत्रकार जास्त लक्ष देत आहेत किंवा अशाच पद्धतीने काही पत्रकार काम करत आहेत. हे नाकारता येणार नाही. आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर असे पत्रकारच लाखो नाहीतर करोडो रुपयांमध्ये खेळत आहेत. ज्या पत्रकारांनी फक्त ईनामदारीने पत्रकारिता केलेली आहे. अशा पत्रकारांचे घर, अशा पत्रकारांचे परिवार, अशा पत्रकारांची मुलं बाळं ही सामान्य जीवन जगत आहेत. कारण ते खरी पत्रकारिता करत आहेत.

आपल्या समाजात आजही असे पत्रकार आहेत ज्यांना कोणत्याही राजकीय नेत्यांकडे जाऊन त्यांची तळवे चाटेगिरी अर्थात खोटं गुणगान करत त्यांच्याकडे हजार दोन हजार रुपये घेऊन त्यांच्या मानजोगी पत्रकारिता आणि जाहिरात करणे योग्य वाटत नाही. अशा पत्रकारांचा आज आदर करणे आणि अशा पत्रकारांना प्रथम प्राधान्य देणं हे आज खूप महत्त्वाचे आहे. पत्रकारिता करतांना सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार आज काळाची गरज आहे. हे विसरून चालणार नाही. आज समाजात जे काही पत्रकार पत्रकारितेचा धंदा करत फालतू पत्रकारिता करत आहेत त्यांना कुठेतरी थांबवणं गरजेचे आहे. सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि काही महत्त्वपूर्ण राजकीय नेत्यांनी अशा चुकीच्या पद्धतीने कार्यरत असलेल्या पत्रकारांना आळा घालणे आणि योग्य पद्धतीने काम करणाऱ्या पत्रकारांना पुढे आणणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांनी कोणीतरी पत्रकार आपलं काहीतरी चांगलं लिहितोय, आपल्या बाबत चांगलं बोलतोय आणि आपण त्याला पैसे देऊन त्याला विकत घेऊन आपण त्याच्याकडून काहीही करू शकतो.

तसेच त्याच्या नेटवर्कद्वारे हवे ते लेख लिहून आपली प्रसिद्धी करू शकतो. हे बघण्यापेक्षा तो पत्रकार कितपत चांगलं काम करतो? समाजासाठी काय चांगलं करतो? हेही बघणं गरजेचं आहे. काही पत्रकारांनी आणि काही राजकीय नेत्यांनी पत्रकारितेचा धंदा केला आहे. हे नाकारता येणार नाही. यामध्ये सामान्य पत्रकार जो योग्य पद्धतीने पत्रकारिता करत आहे. त्याचे जगणं मुश्किल झालेले आहे. अनेक पत्रकार पत्रकारिता विषय बाजूला ठेवून आपला धंदा कसा चालेल? याकडे लक्ष ठेवून एकमेकांचे पाय मागे खेचतांन दिसत आहेत. अशा काही पत्रकारांना सरकारने आळा घालणं गरजेचे आहे. पत्रकारितेत मुळातच महत्वाचे नियम येणे गरजेचे आहे. काही चुकीच्या पद्धतीने कार्यरत असलेल्या पत्रकारांना कुठेतरी दबाव आणून कायद्याच्या अंतर्गत दाबणे गरजेचे आहे. एखाद्याने यूट्यूब चैनल सुरू केल्यानंतर एक वर्षात तो करोडो रुपये कशे कमवतो? याचा विचार सामान्य नागरिकांनी करणं गरजेचं आहे. एखादा पत्रकार एक युट्युब चॅनेल चालवून लाखो रुपयाच्या गाड्या रस्त्यावर फिरवता आणि लाखो रुपयांची कार्यालये कशी सुरु करतात? याकडे सुद्धा सामान्य नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पत्रकारिता हे कमवण्याचे साधन नाहीच आहे आणि पत्रकारितेमधून लाखो रुपये येऊ शकतच नाहीत. असे माझे स्पष्ट मत आहे. पत्रकारितेमधून लाखो रुपये येण्याचं साधनच नाहीय. तरी पण आजही अनेक पत्रकार कोरडोमध्ये खेळत आहेत. कित्येक प्रॉपर्टी, अनेक महागड्या गाड्या घेऊन फिरत आहेत. हा एवढा पैसा नेमका येतो कुठून? याकडे योग्य पद्धतीने समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच पत्रकारितेसाठी योग्य तो कायदा येणे ही काळाची गरज आहे. जेव्हा पत्रकारांसाठी योग्य तो कायदा येईल आणि त्यानुसार पत्रकारिता होईल तेव्हाच योग्य पद्धतीने काम करणाऱ्या पत्रकारांना संरक्षण मिळेलआणि काही चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या पत्रकारांना पत्रकारांवर योग्य तो दबाव येईल. पत्रकारिता योग्य पद्धतीने होईल. आजच्या काळात योग्य पद्धतीने पत्रकारिता होणे ही खरी काळाची गरज आहे. लोकसभेच्या चौथ्या स्तंभात थोडाफार गोंधळ निर्माण झालेला आहे आणि तो गोंधळ कुठेतरी थांबला पाहिजे. पण राजकीय वर्तुळातच मोठा गोंधळ निर्माण झालेला असल्यामुळे हा गोंधळ सुद्धा वाढत चाललेला आहे आणि ह्याला खरंतर काही राजकीय नेतेच जास्त जबाबदार आहेत. हे एखाद्या पत्रकाराचा बळी गेल्यानंतर,अपघात किंवा खून झाल्यानंतरच काही पत्रकारांना, काही सामाजिक संघटनांना समाजतील काही लोकांना जर जाग येत असेल तर हे लाजस्पद आहे. महाराष्ट्र राज्य किंवा भारतातील विषय तर दूरच राहिला, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच काही पत्रकार आपापल्या वेगवेगळ्या संघटना स्थापन करून संघटनाच्या आपापले कार्यकर्ते नेमत आहेत आणि संघटना स्थापन करून पत्रकारितेमध्ये एकमेकांना मोठं करणं, स्वतःच एकमेकांना स्वतः पुरस्कार देऊन मोठं करणं, आणि राजकीय नेते आणून कार्यक्रम करणं ही पत्रकारिता आहे काय? किंवा अशी पत्रकारिती होत असेल तर खरंच योग्य आहे काय? काही पत्रकारांचे जे फालतु धंदे चालू आहेत ते प्रथम बंद होणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी कायदा मंजूर होणं गरजेचे आहे. नाहीतर पत्रकारांचे मृत्यू किंवा हत्या झाली आणि त्यानंतर जर असं काही चळवळी होत असतील किंवा त्या पत्रकाराबद्दल आपुलकी दाखवली जात असेल तर ह्या मागेही राजकारण आहे. असं म्हणता येईल किंवा असं म्हणणं वावगं ठरणार नाही.


Spread the love

Related posts

बिनापरवाना वाळू वाहातुक करणाऱ्या चार डंपरवर दोडामार्ग पोलिसांची कारवाई

news

पत्रकार वारिशेंच्या खुनाच्या निषेधार्थ उद्या ओरोस फाटा इथं ‘तोंड बंद आंदोलन’सिंधुदुर्गनगरी….

news

आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक!

news

Leave a Comment