कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – महापालिकेच्या कार्यलयीन कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जनतेच्या तक्रारी समजून घेणे, त्यांच्या अडीअडचणी दूर करुन घेणे, नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती स्थानिक स्तरावर देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे नागरिकांच्या तक्रारी, निवेदने यांच्या निपटारा विशिष्ट कालावधीत होणे देखील आवश्यक आहे. याकरिता नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी दु. 3.00 ते 5.00 या कालावधीत परिमंडळ 1 व 2 च्या उपायुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील मध्यवर्ती प्रभागक्षेत्र कार्यालयात “जनता दरबार” आयोजित करण्याबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत. या जनता दरबारात कर्मचारी सेवा विषयक बाबी तसेच नागरिकांच्या सर्व तक्रारी घेणे बंधनकारक राहील. संबंधित परिमंडळातील सर्व संबंधित सहा. आयुक्त व इतर तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी देखील यावेळी हजर राहणे बंधनकारक राहील. संबंधित विभागीय उपआयुक्त यांच्याकडे तक्रारी/समस्या प्राप्त झाल्यावर त्यापुढील 15 दिवसात त्याचे निराकरण करुन नागरिक/कर्मचारी यांना उत्तर द्यावे असे निर्देश आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी एका परिपत्रकान्वये निर्गमित केले आहेत.
