सावंतवाडी (संतोष परब): सध्या बाजारात विक्री होत असलेल्या खाद्यतेलाच्या पिशव्यांबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यापूर्वी १ लिटर खाद्यतेलाची पिशवी १४० ते १६० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध होत होती; मात्र आता अनेक कंपन्यांनी त्याच दराच्या आसपास ७०० मिली, ७५० मिली किंवा ८०० मिली क्षमतेच्या पिशव्या बाजारात आणल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.पूर्वीप्रमाणेच पिशवीचा आकार दिसत असल्याने ग्राहकांना ती १ लिटरची असल्याचा समज होतो; परंतु प्रत्यक्षात तेलाचे प्रमाण कमी असल्याचे घरी गेल्यावर लक्षात येते. किंमत मात्र जवळपास पूर्वीसारखीच असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढत आहे.मोबाईल सिमकार्ड कंपन्यांनी ३० दिवसांचा महिना कमी करून २८ दिवसांचा केल्याने वर्षभरात अतिरिक्त महिना वाढवल्याचा आरोप जसा केला जातो, त्याच धर्तीवर खाद्यतेल कंपन्याही पिशवीचे प्रमाण कमी करून ग्राहकांची आर्थिक लूट करत असल्याची चर्चा सर्वसामान्यांत सुरू आहे. दरम्यान, वाढती महागाई आणि कमी होत चाललेले उत्पादनाचे प्रमाण यावर नियंत्रण कोण ठेवणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून ग्राहकांना योग्य माहिती मिळावी आणि दिशाभूल थांबवावी, अशी मागणी होत आहे.
next post
