ठाणे | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : दि. ०५ जून २०२६ रोजी वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोखरण रोड नंबर २ येथील हनुमान मंदिराजवळ एका इसमाची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना घटनेच्या केवळ २४ तासांच्या आत ठाणे गुन्हे शाखा, वागळे युनिट-५ च्या पथकाने कसारा रेल्वे स्टेशनवरून जेरबंद केले आहे.या गुन्ह्यात आरोपी म्हणून ओळख पटलेले अजय देवकीलाल गिरी (२८ वर्ष) रा. कटकुईया, बहराईच, उत्तर प्रदेश आणि शिवा संजय गोस्वामी (२५ वर्ष) रा. नारायणपुर कला, बहराईच, उत्तर प्रदेश हे दोघे पनवेल रेल्वे स्टेशनवरून गोरखपुर एक्सप्रेसने पळून जाण्याच्या तयारीत होते. गुप्त बातमी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा माग काढत पोलिस पथकाने कसारा रेल्वे स्टेशन येथे त्यांना १८.४५ वाजता ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत १३ संशयित व्यक्तींनाही अटक करण्यात आली.या कारवाईत व.पो.नि. सलील भोसले यांच्या नेतृत्वाखाली मसपोनिरी पल्लवी ढगेपाटील, श्रेणीपोउपनि सुनिल अहिरे, सपोउपनि राजेंद्र चौधरी, पो.ना. तेजस ठाणेकर आणि पो.कॉ. मिनीनाथ शिकारे यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली.ही कारवाई श्री. डॉ. पंजाबराव उगले, पोलिस सह आयुक्त (गुन्हे) आणि श्री. पराग मणेरे, पोलिस उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शेखर बागडे, सहायक पोलिस आयुक्त यांच्या देखरेखीत पार पडली.पोलिसांनी अतिशय वेगवान आणि व्यावसायिक तपास करत आरोपींना रेल्वेतून पकडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वर्तकनगर पोलिस स्टेशनकडून सुरू आहे.
