सिंधुदुर्ग प्रतिनिधी (संतोष परब): जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), नवी दिल्ली, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २ व ३ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे ‘Life and Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.या परिसंवादासाठी मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका व इतिहास संशोधक डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांना प्रतिनिधी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून त्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे.डॉ. तोरसकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीशी संबंधित ‘मोरयाचा धोंडा’ या ऐतिहासिक स्थळाचा संशोधनात्मक अभ्यास केला असून, त्यावर आधारित संशोधनपर पेपर या परिसंवादात सादर केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या प्रारंभी मोरयाचा धोंडा येथे केलेले गणेशपूजन व सागरपूजन, त्यामागील ऐतिहासिक संदर्भ आणि स्थानिक परंपरांचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे.मोरयाचा धोंडा या स्थळाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वासाठी किल्ले प्रेरणोत्सव समितीने केलेल्या प्रयत्नांना तसेच डॉ. तोरसकर यांच्या सागरी किल्ल्यांच्या इतिहासावरील पीएचडी संशोधनाला राष्ट्रीय व्यासपीठ मिळणे ही महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.या सहभागामुळे मालवण, सिंधुदुर्ग किल्ला आणि मोरयाचा धोंडा यांचा इतिहास देशाच्या राजधानीतील शैक्षणिक व्यासपीठावर पोहोचणार असून, या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह मालवणच्या सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
