मुंबई: रक्षाबंधनाच्या दिवसापासून, म्हणजे २८ ऑगस्टपासून महाराष्ट्रात ‘धर्मस्वातंत्र्य कायदा’ लागू होणार आहे. १७ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र शासनाकडून याविषयीचे राजपत्र प्रसारित करण्यात आले आहे. बळजोरी, प्रलोभने आणि फसवणूक यांद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे.विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, २०२६’ संमत करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून या कायद्याला संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून कायद्याचे राजपत्र प्रसारित करण्यात आले आहे.
कायद्यानुसार शिक्षेचे प्रावधान !
या कायद्यानुसार दोषी व्यक्ती किंवा संस्था यांच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. अनधिकृत धर्मांतरासाठी ७ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड, असे प्रावधान आहे. महिला, अल्पवयीन आणि मानसिकदृष्ट्या असक्षम व्यक्ती किंवा अनुसूचित जाती-जमातींमधील व्यक्ती यांच्या संदर्भात धर्मांतराची घटना घडली असेल, तर शिक्षेचे स्वरूप ७ वर्षांपर्यंत कारावास अन् ५ लाख रुपयांपर्यंत दंड, असे अशी आहे. वाड्याच्या वाड्या नियोजनबद्धरित्या धर्मांतरित करण्यात आल्या आहेत. अशा वेळी सामूहिक धर्मांतराच्या प्रकरणातही ७ वर्षे कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. वारंवार गुन्हा करणार्या गुन्हेगाराला १० वर्षांपर्यंत कारावास आणि ७ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
कायद्याची वैशिष्ट्ये !
अ. या कायद्यानुसार ज्या व्यक्तीला धर्मांतर करायचे आहे, तिला किंवा धर्मांतराचे आयोजन करणार्या संस्थेला किमान ६० दिवस आधी जिल्हा दंडाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरण यांना पूर्वसूचना देणे अनिवार्य आहे.आ. धर्मांतर करायचे असल्यास २५ दिवसांच्या आत राज्य सरकारकडे नोंद करावी लागेल. कायदेशीर प्रक्रिया झाली नसेल आणि संबंधित तरुण-तरुणी ही दबावाखाली असल्याचे अथवा आमिषाला फसल्याचे दिसत असेल, तर धर्मांतराला अनुमती नाकारण्यात येणार आहे.इ. लग्नापूर्वी धर्म लपवला किंवा लग्नानंतर सक्तीने धर्म पालटण्यास भाग पाडले, तर तो गुन्हा समजला जाईल. केवळ विवाहासाठी किंवा पहिला विवाह लपवून धर्मांतर करणे, हे कायद्याच्या चौकटीत पडताळले जाईल. विवाह केवळ धर्मांतर करण्याच्या उद्देशाने केला गेला असेल, तर न्यायालय विवाह अनधिकृत ठरवून तो रहित करू शकते.ई. फसवणूक करून लग्न केल्यानंतर जे अपत्य होईल, त्यांना आईचा लग्नापूर्वीचा धर्म मिळेल, तसेच त्यांना आई-वडिलांच्या मालमत्तेमध्येही हिस्सा मिळेल.उ. धर्मांतरित व्यक्ती, त्यांचे पालक, भावंडे किंवा रक्ताच्या नात्यातील कुणीही व्यक्ती अनधिकृत धर्मांतराची तक्रार प्रविष्ट करू शकते. लव्ह जिहाद प्रकरणात पीडित कुटुंबातील व्यक्ती मुलीच्या वतीने तक्रार प्रविष्ट करू शकतील.
