संपादकिय✍🏻: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील प्रामाणिक निष्ठावंत, दानशूर असे व्यक्तिमत्व म्हणजे सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा आज वाढदिवस सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. संजू परब यांनी गेली दोन दशके सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला ठसा उमटवणारे सावंतवाडी संस्थानकालीन नगरीचे माजी नगराध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असे विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदे भूषवली. सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व: सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचे शालेय शिक्षण सावंतवाडी शहरात मिलाग्रीस हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर पदवीपर्यंत शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयात झाले. खरंतर शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळे आपसूकच उद्योग व्यवसायात काम करताना तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री आणि कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांचे नेतृत्व पाहून आपणही राजकारणात डॅशिंग पद्धतीने काम करायचं आणि ते पण जनतेच्या सेवेसाठी हे ठरवून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रभावी व्यक्तिमत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेचा झेंडा हाती घेत सावंतवाडी शहरातील खासकिला वाडा भागाचे शाखाप्रमुख पद स्वीकारले. त्यावेळी शिवसेनेचे युवा पदाधिकारी मनोज नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झेंडा हाती घेत पदाला न्याय देत काम केले. त्यानंतर कंट्रक्शन व्यवसाय आणि शिवसेनेचे काम या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबांना मदत करणे आणि 80 टक्के समाजकारण 20% राजकारण हे ब्रीद घेऊन कार्यरत राहिले.
कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांची कार्यप्रणाली पाहत राजकारणात स्थिरस्थावर होत असतानाच जणू एखाद्या व्यक्तीचा यशाचा काळ ठरवण्यासाठी कुणीतरी यावं लागतं त्या पद्धतीने शिवसेना पक्षातून काँग्रेस पक्षात नेते नारायण राणे यांच्यासोबत गेल्यानंतर श्री राणे यांचे सुपुत्र आमदार निलेश राणे हे खासदारकीच्या निवडणुकीला काँग्रेस मधून त्यांना उमेदवारी मिळाली आणि यावेळी आमदार निलेश राणे यांनी त्यावेळी आपले शिलेदार तयार केलेत. त्यामध्ये पहिला शिलेदार सच्चिदानंद उर्फ संजू परब त्यांच्यासोबत राहत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद संजू परब यांच्याकडे देण्यात आले आणि यावेळी नेते निलेश राणे यांचा विश्वास सार्थकी ठरवत संजू परब यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात युवकांची फळी निर्माण केली आणि खासदार निलेश राणे निवडून आले. त्यानंतर संजू परब यांचा राजकीय प्रवास एका वेगळ्या उंचीवर सुरू झाला. श्री राणे कुटुंबीयांनी स्वाभिमान पक्ष ची स्थापना केली आणि यावेळी संजू परब हे त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनीही स्वाभिमानाची कास धरली. यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष म्हणून स्वाभिमान पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.
या कालावधीत त्यांनी सावंतवाडी पक्षाचे बांधणे उत्तमरीत्या केली. त्यानंतर भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत संजू परब यांना नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली आणि सावंतवाडीच्या नगरपालिकेवर भाजपचा झेंडा पहिल्यांदा संजू परब यांच्या माध्यमातून लावला गेला. संजू परब यांनी सावंतवाडी शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलला. या काळात त्यांनी 57 कोटी रुपये खर्चाची नळ पाणी योजना, अग्निशामक केंद्र असे विकासात्मक कामे त्यावेळी त्यांनी मंजूर करून आणली आणि आज त्याचे फलित आपल्याला दिसत आहे. श्री परब यांचे राजकीय गुरु निलेश राणे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत पहिले शिवसेनेचा झेंडा हाती घेणारे संजू परब आणि याचे त्यांना फलित म्हणजे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना जिल्हाप्रमुख पद मिळाले. आज गेली दीड दोन वर्ष ते उत्तमरीत्या विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष बळकटीसाठी काम करत आहेत. असे एक अभ्यासू हुशार निष्ठावंत व्यक्तिमत्व म्हणून सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्याकडे पाहिले जाते.आज सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस सर्वत्र जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा होत आहे.
