
मसुरे प्रतिनिधी: मिळालेले यश तुमच्या कठोर परिश्रमांचे फलित आहे. शिक्षण आणि शिस्त हीच तुमच्या उज्ज्वल भविष्याची खरी ढाल आहे. त्यामुळे नेहमी सत्य आणि निष्ठेच्या मार्गावर चाला. यश मिळवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनणे आवश्यक आहे. वेळेचे नियोजन करून अभ्यास करा असे आवाहन हडी गावचे सुपुत्र सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुधीर कदम यानी येथे केले. फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील दहावी, बारावी, पदवी, स्पर्धा परीक्षा यातील 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम हडी जठारवाडी शाळा येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाला. यावेळी यावेळी माजी सभापती उदय परब, अध्यक्ष देविदास सुर्वे, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, कोषाध्यक्ष प्रभाकर सुतार, सल्लागार चंद्रकांत पाटकर, किशोर नरे, कृषी सेवक विवेक रंगे, सोनाली कदम, शिक्षिका श्रीमती कुबल,श्रीमती मालंडकर, ओझर हाय. मुख्या. दीपक जाधव, सदस्य नंदकुमार पाटील, प्रज्ञा तोंडवळकर, सीमा शेटये, दिनकर सुर्वे, नंदकुमार पाटील, रमेश कावले, गुरुनाथ गावकर, प्रभाकर चिंदरकर, किशोर नरे, राणे सर, आंगणे मॅडम, पोलीस पाटील तृप्ती हडकर, दिनेश सुर्वे, श्रीमती पांजरी तसेच ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष देविदास सुर्वे यानी स्वागत केले.

यावेळी माजी सभापती उदय परब म्हणाले, हडी जेष्ठ नागरिकांचे विविध उपक्रम अनुकरणीय असतात. सर्वांनी आपली एकी अशीच कायम ठेवावी. यश मिळविणे सोपे आहे पण टिकवणे कठीण असते. हडी गावात होणारा हा गुण गौरव कार्यक्रम म्हणजे जेष्ठ नागरिकांची कौतुकाची थाप आहे असे सांगितले. विवेक रंगे म्हणाले, विध्यार्थी चुकीच्या मार्गाने जात आहेत. ध्येय निश्चित करण्याची मानसिकता कमी होत आहे. मोबाइल मध्ये जास्त न अडकता कामा पुरता मोबाईल वापरा. वृद्धाना योग्य तो मान सर्वांनी द्यावा असे आवाहन केले. मान्यवरानी मनोगत व्यक्त केले. सल्लागार चंद्रकांत पाटकर यानी गेली 19 वर्ष हा गुणगौरव कार्यक्रम अविरत चालू असल्याचे प्रस्ताविक करताना सांगितले. प्रस्ताविक व आभार चंद्रकांत पाटकर यांनी मानले.
